Our Blog

मधूमेह व रक्तदाबापासून किडनीचा बचाव...!


जगात मधूमेहाचे सर्वाधिक रुग्ण भारतात आहे. त्यामुळे भारताला मधूमेहाची जागतिक राजधानी म्हटले तरी वावगे ठरणार नाही. मधूमेहाच्या एकूण सहा पैकी एका रुग्णाला रुग्णाला किडनी निकामी होण्याचा धोका संभवतो. मधूमेहाच्या आजाराच्या प्रभावात किडनी आली, तर एका टप्प्यानंतर ती कमकुवत होऊन विशिष्ट कालावधीनंतर पूर्णपणे निकामी होण्याची शक्यता असते. डायलिसिसवर असलेल्या एकूण रुग्णांपैकी 40 टक्के रुग्णांची किडनी मधूमेहामुळे निकामी झाल्याचे नोंद आहे. सगळ्याच मधूमेहग्रस्तांच्या किडनीस दुष्परिणामापासून टाळता येत नसले, तरी विशेष काळजी घेतला तर हा धोका निश्‍चितच कमी होऊ शकतो. एकदा जर मधूमेहामुळे किडनी निकामी होण्याची प्रक्रिया सुरू झाली तर किडनीस पूर्ववत करण्यासाठी उपाय नाही. मात्र, योग्य काळजी घेतल्यास ज्यांच्या किडनीवर दुष्परिणाम झाले आहेत, अशा रुग्णांची किडनीच्या कार्यान्वयनाचा कालावधी वाढवता येऊ शकतो. टाईप 1 (टाईप वन) मधूमेहामध्ये वीस वर्षांनंतर 50 टक्के रुग्णांच्या किडनीस हानी पोहचते. टाईप 2(टाईप टू) मधूमेहामध्ये सर्वसाधारणपणे असे अंदाज होता की, 8 ते 10 वर्षात किडनीवर दुष्परिणाम होईल. मात्र, असेही आढळून आले आहे की, बर्‍याच रुग्णांना एवढासुद्धा कालावधी मिळत नाही. बहुतेकदा तर निदान झाल्या-झाल्या किडनीवर प्रभाव पडू लागतो. मधूमेहग्रस्तांपैकी कुठल्या रुग्णाच्या किडनीचे नुकसान होणार; हे जाणून घेणे देखील अतिशय कठीण किंबहुना अशक्यच आहे. रुग्णांना दीर्घकाळापासून मधूमेह असेल, त्यांची रक्तशर्करा नियंत्रणात नसेल, मधूमेहाचा डोळ्यांवरही परिणाम झालेला असेल, रक्तदाब देखील नियंत्रणात नसेल आणि परिवारात कुणाची किडनी मधूमेहामुळे ग्रसित झाली असेल, तर अशा व्यक्तीच्या किडनीवर परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. मधूमेहामुळे नेमकं काय होतं तर रक्तशर्करा फार कालावधीसाठी वाढलेली असल्यास प्रोटिन परिवर्तित होऊ लागते. हे परिवर्तित झालेले प्रोटिन किडनीच्या फिल्टरमध्ये म्हणजे नेफ्रॉनमध्ये अडकतात. शिवाय मुत्रमार्गाद्वारे प्रोटिन शरीराबाहेर जाणे सुरू होते. त्यामुळे प्रोटिनचे प्रमाण कमी व्हायला लागते. मग रक्तदाब वाढू लागतो आणि किडनीची रक्तशुद्धीकरणाची क्षमता कमी होऊ लागते. ही क्षमता कमी होत होत एका बिंदूला किडनी निकामी होते. ही प्रक्रिया दोन्ही किडन्यांमध्ये एकाच क्षणाला ही प्रक्रिया सुरू होते. मधुमेहामुळे किडनीवर दुष्परिणाम होण्यास सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे अनियंत्रित रक्तशर्करा. मधूमेहात किडनीचे रक्षण करण्यासाठी रक्तशर्करा नियंत्रित करणे अत्यावश्यक आहे. डॉक्टरांनी सांगितलेल्या गोळ्या नियमित घेऊन, आहारावर नियंत्रण ठेवत व्यामाम करून रक्तशर्करा नियंत्रणात ठेवावी. शिवाय कुठलाही त्रास नसतांना नियमित्रपणे तपासणी करून घ्यावी. तंबाखूचे सेवन केल्याने किडनीवरचे दुष्परिणाम शीघ्र गतीने होतात. मधुमेहग्रस्त व्यक्ती नियमित रक्तशर्करा तपासणी करीत असेल. मात्र, लघवीद्वारे प्रोटिन जातेय का, रक्तामधील लिपीड वाढतय का हे तपासणे आणि ब्लड प्रेशर 130 बाय 85 पेक्षा कमी ठेवत व किडनी कशी काम करते हे तपासण्याची रक्तातील सिरम क्रियाटिनीन चाचणी सहा महिन्यातून एकदा करणे अत्यावश्यक आहे. मधूमेहामुळे किडनीवर प्रभाव पडत असल्यास, लघवीतून प्रोटिन जात असल्यास व सिरम क्रियाटिनिनचे परिणाम वाढत असल्यास नियमित घेण्याच्या गोळ्या बंद करून इंसुलिनचे इंजेक्शन सुरू करणे आवश्यक आहे. अन्यथा शर्करेचा स्तर कमी होऊन कोमामध्येही जाण्याची शक्यता असते. त्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.


डॉ. धनंजय ऊकळकर,
कंसल्टंट नेफ्रोलॉजिस्ट,
अश्‍विनी किडनी व डायलेसिस सेंटर
नागपूर

किडनी रोगांमध्ये प्रोटिन आहाराचे महत्त्व


किडनी कमकुवत झाली याचे निदान झाले की, काही शब्द जनसामान्यांच्या मनात सहज येतात. जसे की डायलेसिस, जयप्रकाश नारायण किडनी ट्रान्सप्लांट (जुन्या पिढीच्या मनात हे येते) आणि आहारातील प्रोटिन बंद करणे वगैरे. बाकी सर्व गोष्ट ठीक आहेत, पण आहारातील प्रोटिन बंद करणे हा फार मोठा गैरसमज आहे. आपल्या आहारात कार्बोहायड्रेट, प्रोटिन आणि चरबी (फॅट) हे तीन मुख्य घटक आहेत. शरीराला कॅलरीज् आणि उर्जा देण्यासाठी कार्बोहायड्रेड आणि फॅट उपयोगी ठरते. शरीरातील प्रत्येक पेशी व त्यामध्ये चालणार्‍या प्रक्रियेसाठी प्रोटिन आवश्यक आहे. त्यामुळे प्रोटिन्स तुटून युरीया व क्रियाटिनीन निर्मितीची प्रक्रिया सतत सुरू असते. आणि हा बायप्रॉडक्ट शरीराबाहेर पाठविण्यासाठी किडनी कार्य करते. त्यामुळे लघवीद्वारे हे टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर काढल्या जातात. अशा वेळी सहाजिक आहे की, किडनी कमकुवत झाली तर युरिया आणि क्रियाटिनीन शरीराबाहेर पाठवण्याची प्रक्रिया मंदावते व पर्यायाने रक्तामधील त्याचे प्रमाण वाढू लागते. रक्तामधील युरियाचे प्रमाण 150 मिलिग्राम पर डेसिलीटर व सिरम क्रियाटिनीनचे प्रमाण 5 मिलिग्राम पर डेसिलीटरपेक्षा जास्त झाले तर त्यामुळे यामुळे भूक मंदावते, मळमळ होते आणि उलट्या सुरू होतात. आज अशा परिस्थितीला कुणी पोहचलं, तर नियमितपणे आठवड्यातून तीनदा डायलिसिस करून युरिया व क्रिएटिनिनचे प्रमाण नियंत्रित ठेवता येते. पन्नास वर्षांपूर्वी डायलेसिसच्या सुविधा सर्वदूर उपलब्ध नव्हत्या. डॉ. बुल या वैद्यकीय शास्त्रज्ञाने यावर तोडगा म्हणून प्रोटिनरहित आहार सुचविला होता. त्यांचा तर्क असा होता की, प्रोटिन खाल्लेच नाही तर शरीरातील युरिया आणि क्रियाटिनिन तयार होण्याची गती कमी होईल आणि शरीरातील प्रमाण नियंत्रणात येऊन रुग्णाच्या आयुष्यातील क्लेष कमी होईल. मात्र आता आपल्याला वैद्यकीयशास्त्रातील प्रगतीमुळे ही कठोर पाऊले उचलण्याची गरज नाही. कारण जी रुग्ण आहारातील प्रोटिन कमी करतात, त्यांच्या शरीरात असलेल्या स्नायुमधील प्रोटिन शरीर शीर्घगतीने वापरायला लागते. आणि एकदा जर रक्तातील प्रोटिनचे प्रमाण कमी झाले, तर अशा व्यक्तीस निरनिराळ्या प्रकारच्या जंतूंचा आणि रोगांचा प्रादुर्भाव (इंफेक्शन्स) होण्याची शक्यता वाढते. रक्तातील प्रोटिन कमी असताना ज्यांचे डायलेसिस सुरू होते किंवा ट्रान्सप्लांट करण्यात येते, त्यांना या दोन्ही उपचारपद्धतींचा फायदा मिळत नाही आणि शारीरिक गुंतागुंतींला समोरे जावे लागते. महाराष्ट्रातील नागरिकांच्या आहारामध्ये तसेही प्रोटिनचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा फार कमी आहे. त्यामुळे अशा प्रकारे ‘आहारातील प्रोटिन कमी किंवा बाद करण्याचे सल्ले’ पुष्कळदा जीवघेणेही ठरू शकतात. एकूण वजनाच्या प्रमाणाचा विचार केला तर आहारामध्ये दररोज कमीत कमी ‘एक ग्राम प्रति किलोग्राम’ एवढ्या प्रमाणात प्रोटिनचे सेवन असावे. शाखाहारी व्यक्तींना हे प्रोटिन आपल्या एवढ्या प्रमाणात आहारातून मिळविणे कठीण असते. शाकाहारी भोजनामध्ये डाळ, पनीर, सोया आणि दुधाचे पदार्थ मुख्य प्रोटीनचे स्त्रोत आहेत. जेवनामध्ये या गोष्टीं प्रमाणात असल्याच पाहिजे. किडनी निकामी झाल्यानंतर प्रोटिन खाण्याची इच्छा नैसर्गिकरीत्याच कमी होते. अशा वेळी जर कुणी प्रोटिनचे सेवन करू नये असा सल्ला दिला आणि त्याचे पालन केले तर आणखी गुंतागूंतीला सामोरे जावे लागू शकते.


डॉ. धनंजय ऊकळकर,
कंसल्टंट नेफ्रोलॉजिस्ट,
अश्‍विनी किडनी व डायलेसिस सेंटर
नागपूर

आयुष्य किडनी प्रत्यारोपणानंतरचे...!


किडनीचे प्रत्यारोपण ही प्रक्रिया किडनी पूर्णपणे निकामी झाल्यानंतर करण्यात येते. किडनी जर तात्पुरती निकामी झाली असेल, तर ते पुष्कळदा ती बरी होऊ शकते. मात्र, अशा वेळेस जोपर्यंत किडनी निकामी आहे, तोपर्यंत डायलेसीस करून आयुष्य वाचविता येते. पण किडनी तीन महिन्याहून अधिक काळ निकामी झाली असेल तर प्रत्यारोपणाच्या विकल्पांची शक्यता तपासून पाहिल्या जाते. किडनीचे कार्य ‘ईजीएफआर’वर मोजण्यात येते. ईजीएफआर जर दहा एमएल प्रति मिनिटापेक्षा कमी असेल, तर डायलेसीस व प्रत्यारोपणाशिवाय अशा व्यक्तीचे आयुःमान वाढविणे अशक्यच असते, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. किडनी निकामी झालेल्या सर्वच रुग्णांसाठी प्रत्यारोपण हा प्रभावी उपचार ठरू शकत नाही; अथवा पर्यायही ठरू शकत नाही. ज्या रुग्णांच्या हृदय, यकृत अथवा फुफ्फुस कमकुवत झाले असेल तर, तशा रुग्णांना प्रत्यारोपण झेपण्याची शक्यता फार कमी असते. आपल्या समाजामध्ये भावनांच्या भारामध्ये कैक लोक किडनी प्रत्यारोपणासाठी लागणार्‍या खर्चाची व्यवस्था कशीबशी करतातही...! मात्र, किडनीचे प्रत्यारोपण केल्यानंतरसुद्धा 10 ते 12 हजार रुपयांची औषधे दर महिन्याला सेवन करावी लागतात. याशिवाय नियमित तपासण्या करून घेणेही अत्यावश्यक असते. किडनी प्रत्यारोपण केल्यामुळे शरीराची प्रतिकारक शक्ती देखील कमी होते. शिवाय अन्य गुंतागुंतही निर्माण होतात. त्यामुळे अधूनमधून निर्माण होणार्‍या वैद्यकीय समस्यांपासून निपटण्यासाठी वेळोवेळी इस्पितळातही भरती व्हावे लागते. यासाठी होणार्‍या खर्चाची तरतूद नसेल, तर किडनीचे प्रत्यारोपन करण्याचा निर्णय चुकीचाही ठरू शकतो. किडनी ट्रान्सप्लांटसाठी कुणीतरी दाता (डोनर) लागतो. शक्यतो तो कुटूंबातलाच असावा म्हणजे ती किडनी जास्तीत जास्त दिवस चालण्याची शक्यता असते. आज कुटूंब छोटे होत असून मानवी संबंध कोरडे होत चालले आहेत. अकृत्रिम स्नेहाच्या अभावामुळे कुटूंबातून किडनीसाठी दाता (डोनर) मिळणे तसे अवघड झाले आहे. आणि किडनी विकणे आणि विकत घेणे या दोन्ही बाबी भारतीय दंड विधानानुसार गुन्हा ठरतात. अशा वेळी मेंदूमृत व्यक्तींकडून किडनी मिळविणे हा एकमेव मार्ग आहे. पुष्कळदा किडनीचे प्रत्यारोपण करणे म्हणजे कारची स्टेपनी बदलविण्याच्या प्रक्रियेसारखे आहे, असा समज पसरविण्यात येतो. मात्र, मिळणारी किडनीची स्थिती कशी आहे, यावरही अंतिम रिजल्ट्स अवलंबून असतात. पुष्कळदा हा गैरसमज आहे की, किडनी ट्रान्सप्लांट केले की उर्वरीत आयुष्यात कुठलीच समस्या येत नाही व किडनी आयुष्यभर टिकते. मात्र, वास्तव काहीसे वेगळे आहे, याची जाणीवही किडनी प्रत्यारोपण करून घेणार्‍या रुग्णांना असायला हवी. जागतिक स्तरावर निरिक्षणे असे सांगतात की, किडनीचे प्रत्यारोपण झाल्यानंतर 90 टक्के किडन्या जवळपास 1 वर्षांपर्यंत कायान्वयित असतात. सोप्या भाषेत त्या एक वर्षापर्यंत टिकतात असे म्हणू. 80 टक्के किडन्या या दोन वर्षांपर्यंत तर 50 टक्के किडन्या या 7 वर्षांपर्यंत टिकतात, असे निरिक्षण नोंदविल्या गेले आहे. किडनीचे प्रत्यारोपण करणे ही अत्यंत खर्चित अशी उपचारपद्धती आहे. यासाठी पैसा उभारण्यासाठी लोक आपल घरदार आणि उरली-सुरली सर्व मालमत्ता विकतात. त्यामुळे एवढा मोठा निर्णय घेण्याअगोदर आपणास किडनीचे प्रत्यारोपण काय आहे, त्यानंतरचे जीवनमान कसे असते याची संपूर्ण माहिती घेणे घ्या आणि त्यानंतरच किडनीचे प्रत्यारोपण करायचे की नाही याचा आपल्या विवेकाच्या आधारावर घ्यावा.


डॉ. धनंजय ऊकळकर,
कंसल्टंट नेफ्रोलॉजिस्ट,
अश्‍विनी किडनी व डायलेसिस सेंटर
नागपूर

डायलेसीसवरचे आयुष्य : एक वेगळाच अनुभव


डायलेसीस म्हटले की, भल्याभल्यांना धडकी भरते. मात्र, दरवर्षी भारतामध्ये जवळपास दोन लक्ष रुग्णांच्या किडनी नेहमीसाठी निकामी होऊन जातात. अशावेळी रुग्णाचे जीवनमान वाढवायचे असल्यास त्यांच्यासमोर डायलेसीस आणि किडनीचे प्रत्यारोपण हे दोनच पर्याय उरतात. त्यापैकी दहा टक्क्यांहूनही कमी रुग्ण किडनीचे प्रत्यारोपण करतात किंवा करू शकतात. अन्य रुग्णांना डायलेसीस हा एकमेव पर्याय उपलब्ध असतो. आणि हा पर्याय देखील सर्वांसाठी शक्य नाही. कारण त्याची आवश्यकता असलेल्या व्यक्तीला किमान आठवड्यातून तीन वेळेस डायलेसीस करून घ्यावे लागते. शिवाय औषधोपचारही अत्यावश्यक असतो. त्यामुळे ही एक खर्चिक उपचारपद्धती आहे. गेल्या काही वर्षांमध्ये केंद्र व राज्य सरकारने महात्मा ज्योतिबा फुले जनारोग्य योजना व आयुष्यमान भारत सारख्या योजना आणल्यामुळे अनेक लोकांना डायलेसीस करवून घेणे शक्य होत आहे. डायलेसीसवरचे आयुष्य सर्वसामान्य आयुष्यापेक्षा एकदमच भिन्न असते. म्हणजे एक मशीन आपल्या जीवनाचा अविभाज्य भागच होऊन जाते. आपण असेही म्हणू शकतो की, आपले जीवन चालविण्यासाठी आपल्याला एका मशीनवर अवलंबुन रहावे लागते. आठवड्यातून किमान तीन वेळेस चार-चार तासांसाठी डायलेसीस सेंटरमध्ये जावे लागते. कैक पेशंट तर शंभर किलोमीटरचा प्रवास करून सेंटरपर्यंत पोहचतात. हा उपचार केवळ चार तासांचा न राहता प्रत्येक दिवसाआढ रुग्णाचे किमान आठ तास तरी खर्च होतात. काही रुग्णांचा पूर्ण दिवसच या प्रक्रियेमध्ये व्यस्त होऊन जातो. डायलेसीस सुरू होण्यापूर्वी आहारावर अनेक निर्बंध घातलेले असतात. एकदा का डायलेसीस सुरू झाले की, त्यातील पुष्कळसे निर्बंध शिथील होऊ लागतात. ही उपचार प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी रुग्णास फार थकवा जाणवत असतो. एकदा का डायलेसीस सुरू झाले की, हा थकवा पंधरा ते वीस दिवसात कमी होऊ लागतो. शिवाय श्‍वास घेणे सुरळीत होते आणि पायावरील सुज नियंत्रणात येते. दर आठवड्यात जवळपास तीन दिवस या उपचारासाठी केंद्रावर यावे लागत असल्याने नोकरी टिकविणे जवळपास अशक्यच होते. .शिवाय पुष्कळशा रुग्णांना डायलेसीस सुरू झाल्यावर पाण्यावच्या सेवनावरील निर्बंध पाळावे लागतात. ऐंशी टक्के डायलेसिसवरच्या रुग्णांमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या असते. त्यामुळे त्यांना त्याची औषधे घ्यावी लागतात. डायलेसीस केवळ रक्त शुद्ध करते. किडनीची अन्य कामे करीत नाही. त्यामुळे रक्त बनविण्यासाठी ‘एरिथ्रोपॉयटिनचे इंजेक्शन्स’ ही डायलेसीसवर सुद्धा सुरू ठेवावे लागतात. डायलेसीस प्रक्रियेत खंड पडला तर जीवाची हानी होऊ शकते, त्यामुळे यामध्ये खंड न पडू देणे हे चांगलेच. सत्तर टक्के अथवा त्याहून अधिक रुग्णांना डायलेसिसवर एकटेपणा जाणवतो व डिप्रेशनही असते. याशिवाय कुटूंबाचे सहकार्यही हळूहळू कमी होऊ लागते. या उपचारपद्धतीमध्ये कुटूंबाचे सहकार्य अत्यावश्यक असते. त्यामुळे सामाजिक आणि कौटुंबिक सहकार्य जास्तीत जास्त टिकवणे आवश्यक आहे. विछिन्न मनस्थितीला टाळण्यासाठी भावनांच्या चढ-उतारांवर नियंत्रण ठेवणे देखील तेवढेच आवश्यक आहे. त्यासाठी मनाची खंबीरता आणि कुटूंबाची साथ अत्यावश्यक असते. दोन्ही किडन्या नेहमीसाठी निकाम्या झाल्या तर आयुष्य पूर्ववत होणे कठीण असते किंबहुना अशक्यच आहे. एकदा का जीवनात डायलेसीस प्रक्रियेला सुरुवात झाली की, आपले सामाजिक, आर्थिक, कौटूंबिक आयुष्य बदलते. मात्र, अशा वेळी डगमगूमन न जाता या नवीन परिस्थितीची माहिती मिळवून नियमितपणे औषधोपचार करून घ्यावा. कारण स्वतःचे मनोबल दृढ ठेवून कुटूंबाचा सहाय्याने कैक लोक या आयुष्याच्या आव्हानाशी सुद्धा सुंदर प्रकारे सामना करतात.


डॉ. धनंजय ऊकळकर,
कंसल्टंट नेफ्रोलॉजिस्ट,
अश्‍विनी किडनी व डायलेसिस सेंटर
नागपूर

वेदनाशामक औषधे आणि किडनीची सुरक्षा


किडनीची कार्यक्षमता कमी होण्यासाठी जंतुंचा प्रादुर्भाव (इंफेक्शन्स), मलेरिया-डेंग्युसारखे रोग व आणखी एक महत्त्वाचे पण दुर्लक्षित कारण म्हणजे वेदनाशामक औषधे (पेनकिलर्स) होय. आपल्याकडे एक प्रथाच आहे की, थोडसं काही दुखलं की, औषधांच्या दुकानात जाऊन वेदनाशामक औषधे घेऊन यायची व त्याचे सेवन करायचे. त्याच्या सेवनाने तातपुरता आराम होऊन दुखणे कमी होते. मात्र, त्याच्या दुष्परिणामाबाबत लोक अनिभिज्ञ असतात. एका विशिष्ट वयानंतर संधीवातसारखा आजार होत असतो आणि अशा वेळेसही जीवनमान सुसह्य होण्यासाठी लोक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार किंवा सल्ल्याविनादेखील वेदनाशामक औषधी वापरून आपले आयुष्य सुसह्य करण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये नॉन स्टिरॉईडल अ‍ॅन्टी इंफ्लमेटरी ड्रग्स-एनएसएआयडी सर्रास वापरण्यात येतात. अशा प्रकारच्या औषधांमध्ये इबुफ्रोफेन, किटोप्रोफेन, डायक्लोफिनिक सोडियम, निमोसोलाईट ही रसायने सर्वसामान्यपणे आढळून येतात. या औषधांचा किडनीच्या कार्यावर प्रभाव पडतो. वेदनाशामक औषधांच्या सेवनांमुळे अक्युट किडनी फेल्युअर म्हणजे थोड्या कालावधीतच किडनी फेल होणे किंवा दीर्घकाळ हळूहळू दोन्ही किडन्या फेल होणे (क्रॉनिक सीकेडी) ही दोन्ही किडनी निकामी होण्याची प्रक्रिया आढळून येऊ शकते. वेदनाशामक औषधांच्या वापरामुळे किडनी निकामी होण्याची शक्यता सर्वात जास्त ही ज्येष्ठ नागरिकांमध्ये आणि मधूमेह असणार्‍यांमध्ये आढळून येते. शिवाय कुठल्याही कारणांनी शरीरातील पाणी कमी झाले असल्यास किंवा यकृत कमजोर झाले असेल तर अशा व्यक्तीला वेदनाशामक औषधांमुळे किडनी निकामी होण्याचा धोका असतो. किडनी कमकुवत झाल्यास भूक कमी होणे, उलट्या होणे व रक्तातील युरिया व क्रियाटीनिन वाढणे हे चिन्ह दिसू लागतात. किडनीमध्ये बाहेरील भागास कॉर्टेक्स असे म्हणतात आणि आतील भागात मेड्युला नामक भाग असतो. वेदनाशामक औषधांच्या सेवनामुळे कॉर्टेक्सचा रक्तपुरवठा मेडुलाकडे वळतो. त्यामुळे कॉर्टेक्सला हानी पोहचते, त्यांचे पोषण होत नाही आणि पर्यायाने किडनी निकामी होऊ लागते. वेदनाशामक औषधांमुळे त्रास होऊ नये म्हणून कमीत कमी वेळासाठी आणि वैद्यकीय निगराणीतच त्याचे सेवन करावे. उठसुठ कुठल्याही दातदुखी, डोकेदुखी, सांधेदुखीच्या वेदना कमी करण्यासाठी स्वतःहून वेदनाशामक औषधांचे सेवन करणे टाळले पाहिजे. जर वेदनाशामक औषधांचे सेवन करीत असाल तर पाण्याचेही योग्य प्रमाणात सेवन झाले पाहिजे. शिवाय वेदनाशामक औषधांचा डोजही फार कमी आणि कमीत कमी कालावधीसाठी असला पाहिजे, याची काळजी घ्यावी. शिवाय किडनीच्या कार्याकडे लक्ष देणेही क्रमप्राप्त आहे. काही औषधांसोबत (अ‍ॅन्ज्यियोटेन्सिन इनहिबिटर्स) वेदनाशाम औषधांचा वापर केला तर किडनीला इजा होण्याची शक्यता अनेक पटीने वाढू शकते. त्यामुळे ही औषधे एकत्र घेण्याचे टाळावे. यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही चांगले. वेदना कमी करण्यासाठी पॅरासिटॅमॉल ही तशी सुरक्षित वेदनाशामक असली तरी अंतिमतः तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेदनाशामक औषधे घेऊ नये.


डॉ. धनंजय ऊकळकर,
कंसल्टंट नेफ्रोलॉजिस्ट,
अश्‍विनी किडनी व डायलेसिस सेंटर
नागपूर

blog 6


content 6


डॉ. धनंजय ऊकळकर,
कंसल्टंट नेफ्रोलॉजिस्ट,
अश्‍विनी किडनी व डायलेसिस सेंटर
नागपूर